मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

#निमित्त.

#worldpeaceDay...

 

        “जागतिक शांतता दिवस” हा संपूर्ण जगात #शांतता आणि #अहिंसा स्थापित करण्यासाठी दरवर्षी  २१ सप्टेंबरला साजरा केला जातो. ... २१ सप्टेंबर १९८२ हा प्रथम आंतरराष्ट्रीय #शांतीदिन ठरला.

         २००१ साली या ठरावात बदल करुन सप्टेंबरमधील तिसरा मंगळवार न धरता, २१ सप्टेंबर या दिवसावर #शांतीदिनम्हणून शिक्कामोर्तब झाले.

         जागतिक अशांतता पाहिली तर खरंच शांततेची गरज आहे.मानवी जीवनमूल्ये पायदळी तुडवली जात आहेत.मानवी भावना सर्वत्र राजरोसपणे भडकवल्या जाताहेत.हे नक्कीच मानवीहितासाठी योग्य नाही;पण मानवाला हे समजत नाही.सगळीकडे भडकपणा वाढत चाललेला आहे.वडिल किंवा वडीलधारी मंडळी यांच्याविषयी कसलाही आदर बाळगला जात नाही.एकमेकांविषयी बोलताना दर्जा रसातळाला चालल्याची जाणिव सतत होत असते.कुठंतरी हे एका मर्यादेत यायला हवे.

         शांतता किंवा अहिंसा ही बोलण्याची असावी वागण्याची असावी,कृतीची असावी, एकूणच काय तर ती आचरणातून दिसावी.शांतता ही तुम्हाला निसर्गाशी तादात्म्य पावण्याची शक्ती प्रदान करते.

          कोरोना काळातील अखिल विश्वाने ती अनुभवली.जगाचे सगळे ठप्प झाले. जग स्तब्ध झालं.निरव शांतता सर्वदूर पसरली. त्यात एक भीषणता होती,भयानकता होती तरीही ती मनालाच काय पण निसर्गालासुद्धा उल्हासित करणारी होती.उभ्या जगाला बुद्धाने शांतीचा संदेश दिला त्यामागचे गमक मानवासमोर आले;पण मानव प्राणी हाही शेवटी एक प्राणीच आहे.भौतिक सुखांच्या पाठीमागे पळून होणारी दमछाक मिटवण्यासाठीही तो पुन्हा भौतिक साधनांचीच मदत घेत असतो.आता पुन्हा जग शांत होईल न होईल पण बारकाईने आठवण्याचा प्रयत्न करुन पहा. कोरोना काळातील दिवसा पहाटे संध्याकाळी हवेचा आवाज पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू यायचा.निसर्गातून चिमण्या नष्ट होत चालल्या आहेत;पण त्या जेवढ्याकाही असतील तेवढ्यांच्याही अस्तित्वाची नोंद त्या आपल्याला त्यांच्या चिवचिवटातून करुन देत होत्याच.निसर्गाचं नादमाधुर्य त्या काळात पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं. साधारण १९८५ च्या काळातही ते बऱ्यापैकी आमच्या पिढीने अनुभवलं आहे.कारण त्या काळी बऱ्यापैकी कमी भौतिक साधनं अस्तित्वात होती.गाड्यांचे आवाज नव्हते टीव्ही मिक्सर यांचेही आवाज नसायचे. रेदिओ मात्र असायचे पण गाण्यातून मधुरताचा अनुभवायला मिळत होती. कारण कानाला बधिरता प्राप्त करुन देणारं संगीत त्याकाळात नव्हतं.

         सृष्टीला शांततेची गरज आहेच हेच आपल्याला दिसेल. एका दिवसापुरता शांततादिन काहीही उपयोगाचा नाही.तो किमान सप्ताह किंवा पंधरवाडा असायला हवा. या काळात सर्व वाहने बंद करुन फक्त शांतता अनुभवायला हवी. कारण शांततेलाही आपला स्वतःचा एक आवाज असतो;तो सगळ्यांनाच ऐकू येत नाही हे मात्र वाईट आहे.

          ज्या दिवशी शांतता आणि अहिंसा मानवी जगण्याचं जीवनाधार बनेल.

                           “विश्वशांती करके दिखलाये

                           तब होवे प्रण:पूर्ण हमारा,

                            झंडा ऊँचा रहे हमारा...”

त्यादिवशी खऱ्या अर्थाने हा दिवस साजरा केल्याचं समाधान उभ्या विश्वाला झालेलं असेल...

                           

 

 

 #जीवनयात्री.                                               

 #©दत्तात्रय_उदारे.

Dattatraya Udare DM

 

                            {फोटो:अर्थातच गुगलवरुन साभार.}



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा